पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आम्हाला 5 जागा मिळाल्या होत्या. आता महायुती असली तरी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणकोण भाजप सोबत राहतील यात शंका आहे. मात्र आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआय ला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, विरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आठवले म्हणाले, पुणे शहरात जागोजागी आमच्या शाखा आहेत. त्यामुळे भाजप ने जरी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या शिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महायुती मध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून वाद सुरू असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश मार्गी लावतील असे सांगत, राज्य मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त आहे त्याजागेवर आरपीआय ला मंत्रिपद द्यावे अशी मागणीही आठवले यांनी केली.
वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणाशी संबंधित घटनेत वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र सर्व घटनांचा तपशील बघितलं तर त=देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा संबंध कराडशी असल्याने त्यांच्यावर फक्त खंडणी नाही तर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
*भीमा कोरेगाव विजयस्तंभ आराखाडयासाठी 10 कोटी राज्याने द्यावेत *
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज भीमा कोरेगाव विजय स्तंभ जागे संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी स्मारकासाठी 150 एकर जागा सरकार देणार आहे, त्यातील साडे 9 एकर जागेवर असलेले अतिक्रमण हटवावे, या स्मारकांच्या नियोजित आराखाडयासाठी राज्य सारकराणे तत्काल 10 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज भरतानाच जात वैधयता प्रमाणपत्र आवश्यक
निवडणून आलेल्या अनेक उमेदवारांचे पद जात वैधता प्रमाणपत्र जमा न केल्याने रद्द केले जाते. याकडे रामदास आठवले यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, आरक्षित जागेवर उमेदवार देताना पक्षांनी विचार केला पाहिजे. उमेदवारी देतानाच त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे की नाही यांची खातरजमा करूनच त्यांना पक्षाने उमेदवारी अर्ज दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.